राज्यात आरक्षणासोबत दुष्काळाचा विषय गंभीर बनला आहे. आपल्या मागण्यांसाठी कित्येक किलोमीटर पायपीट करत माणसे आझाद मैदानावर आली आहेत. राज्यात अशी अवस्था याआधी कधीच झालेली नव्हती. ६ महिन्यांपूर्वी दिलेले शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी पाळले नाही, शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे, असे वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले.
साडेपाच लाख शेतकरी सरकारी मदतीपासून वंचीत आहेत. आपला आक्रोश मांडण्यासाठी हा शेतकरी मोर्चा निघाला आहे, तो या सरकारला शेवटचा धडा देण्यासाठी येणार आहे,असे मुंडे म्हणाले.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आतापर्यंत ४१ जणांनी आपले जीव गमावले. त्यांना दहा लाख व शासकीय नोकरी देण्याचे आश्वासन या सरकरने दिले होते, त्याची परिपूर्तता झाली का याचे उत्तर सरकारने द्यावे, असे मुंडे परिषदेत म्हणाले.
विधान परिषदेत मागासवर्गीय आयोगाचा अहवाल पटलावर का घेतला जात नाही? त्याचबरोबर धनगर आरक्षणाचा टीसने दिलेला अहवालही सदनात मांडला यावा अशी मागणी त्यांनी सभागृहात केली.