

१० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना करतानाच्या समयी दिल्लीतील राजकीय परिस्थिती वेगळे संकेत देत असतानाही प्रतिगामी विचारांच्या पक्षाची साथ न देता नव्या पक्षाची राजकीय विचारप्रणाली युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणा शिरसावंद्य मानत तसेच एकोणिसाव्या व विसाव्या शतकातील युगप्रवर्तक समाजसुधारक महात्मा जोतिराव फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बहुजनहिताय आखून दिलेल्या मार्गखुणांवर ठेवत आदरणीय शरद पवार साहेबांनी आपले पुरोगामी राजकीय व सामाजिक भान अधोरेखित केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने याच विचारांवर आपली वाटचाल कायम ठेवली.
संविधानाचा आदर, लोकशाही संकेतांची जपणूक, उपेक्षित वंचित बहुजनांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध, सहकाराचे सूत्र अवलंबत गरीब शेतकरी व कामगार यांच्या हिताचे समाजकारण, महिला सक्षमीकरण व बालकल्याण हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारांचा गाभा राहिला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापन झाल्यानंतर अवघ्या दोनच महिन्यांत निवडणुका जाहीर झाल्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भारतीय राष्ट्रीय काँग्रेससोबत हातमिळवणी करत सत्तेत सहभाग नोंदवला. अव्वल महाराष्ट्र, अग्रेसर महाराष्ट्र हे ध्येय ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जनहिताची कामे करण्याचे व्रत सुरू ठेवले. अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले. प्रगतिशील, सर्वसमावेशक आणि सुसंस्कृत ही महाराष्ट्राची ओळख प्रस्थापित करण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मोठा वाटा आहे. उद्योग, शेती, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि नियोजनबद्ध शहरीकरण या सात मुद्द्यांवर पक्षाने अनेक स्तरांवर काम सुरू ठेवले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निवडणुकांमध्ये राष्ट्रीय स्तरावर गोवा, नागालँड, मेघालय, मणिपूर, आसाम, गुजरात, केरळ, बिहार, ओडिशा, झारखंड, अरुणाचल प्रदेश या ठिकाणी आपला प्रभाव दाखवला. त्यामुळे राष्ट्रीय पक्ष ही मान्यताही मिळाली. पहिल्या पाच वर्षांत व्यापक कार्यपद्धतीमुळे जनतेने २००४ साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगले समर्थन दिले. २००४ मध्ये पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली युपीए सरकार सत्तेत आले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. शरद पवार साहेब, मा. श्री. प्रफुल पटेल यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाला. पवार साहेबांवर कृषी, सहकार, पशुसंवर्धन मत्स्योत्पादन, ग्राहक संरक्षण व अन्न नागरी पुरवठा या खात्यांची जबाबदारी सोपविण्यात आली. दहा वर्षे पवार साहेबांनी कृषी खात्याची जबाबदारी सांभाळली आणि देदीप्यमान काम करून या खात्याचा चेहरामोहरा बदलून टाकला. त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे शेतकरी वर्ग प्रचंड समाधानी व आनंदी होऊन आजपर्यंत देशात असा कृषिमंत्री झाला नाही असे लोक म्हणू लागले.
